शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

ज्येजू - Seogwipo city- कॅनोलाची फुले

 पिवळा रंग म्हणजे तेज. पिवळा रंग म्हणजे आनंद. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता. पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश. पिवळा रंग म्हणजे वसंत ऋतू!

गेल्या आठवड्यात भारतात आम्ही विजयादशमी साजरी केली. दारांना झेंडूच्या माळा बांधल्या. झेंडूचा तो झळाळता पिवळा आणि केशरी रंग खूपच ऊर्जा देणारा आहे. त्या पिवळ्या रंगाने मला आठवण झाली ती एका ठिकाणाची. असे ठिकाण की जिथे नजर पोचेल तिथपर्यंत, मला असा सुंदर ऊर्जादायी पिवळा रंग दिसला होता. 

ते ठिकाण होते दक्षिण कोरियामधील ज्येजू बेट. दक्षिण कोरियाला अपार नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे आणि ज्येजू तर जणू त्या नैसर्गिक सौंदर्याचा मुकुटमणीच!

पूर्वी ज्येजू अनेक नावानी ओळखले जात असे. देवांची भूमी, कोरियाचे हवाई अशी अनेक नावे. त्यातील सर्वात योग्य नाव होते समदादो. समदादो म्हणजे तीन गोष्टी विपुल प्रमाणात असणारे बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर खडक, वारा आणि स्त्रिया. 
 
ज्वालामुखीच्या मुळे बनलेले बेट असल्याने सर्वत्र बसाल्ट खडक दिसतो. समुद्रात असलेले स्वतंत्र बेट आहे, त्यामुळे चहुबाजूनी वारा वर्षभर घोंघावत असतो. त्यामुळे ज्येजू ला कधी कधी वादळी रस्त्यावरचे वळण किंवा कोपरा असेही म्हटले जाते. कधी काळी ज्येजू ला मातृसत्ताक पद्धतीशी साधर्म्य असलेली कुटुंब पद्धती देखील होती. स्त्रियांनी ज्येजूची खडकाळ जमीन सुपीक बनवण्यासाठी शतकानुशतके अपार मेहनत केलेली आहे. शिवाय ज्येजू च्या हेनयो पाणबुड्या महिला तर जगप्रसिद्ध आहेत. कोणत्याही संरक्षक उपकरणांच्या शिवाय, खोल पाण्यात बुडी मारून अबलोन्स आणि इतर सागरी जीव संपत्ती कमावून आणणाऱ्या ह्या निधड्या महिला जगात एकमेव. 

मी तुम्हाला म्हणाले की झेंडूच्या उत्सवी पिवळ्या केशरी रंगामुळे मला ज्येजूची आठवण झाली. ज्येजूवरील पिवळा रंग आहे कॅनोला फुलांचा आणि केशरी रंग आहे संत्र्यांचा. 

गन्ग्यूल जातीची ही संत्री सगळीकडे तुम्हाला दिसतील. साधारण पणे मँडरिन ऑरेंजेस किंवा टॅन्ग्रीन्स सारखी असणारी ही छोटी छोटी संत्री. बागांतून तर असतातच पण अगदी रस्त्याच्या कडेला देखील, झुडुपांच्या रांगाच्या रांगा ह्या संत्र्यांनी लगडलेल्या दिसतात. काही संत्री तर जमिनीवर गळून पडलेली देखील असतात. पण कोणी ती उचलत नाहीत. ती शहराच्या नगरपालिकेच्या मालकीची असतात. हे पाहिल्यावर ज्येजूचे अजून एक नाव किती चपखल आहे त्याची जाणीव होते. अजून एक नाव होते सम्मोदो. त्याचा अर्थ तीन गोष्टी नसलेले बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर चोर, भिकारी आणि घरांची फाटके! चोर आणि भिकारी नसल्यामुळे घरांना फाटके लावायची गरज नव्हतीच. 

ज्येजूची अर्थव्यवस्था खरेतर उद्योगधंदे, शेती आणि मासेमारीवर अवलंबून होती. पण आता पर्यटन व्यवसायाने ह्या साऱ्यांना मागे टाकले आहे. दक्षिण कोरियातीलच नव्हे तर जगभरातील सगळ्यांनाच जिथे जायचे असते असे हे ठिकाण. अनेक गोष्टींसाठी ज्येजू प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहे. दरवर्षी हजारो लाखो कोरियन आणि चिनी प्रवासी ज्येजूला भेट देतात. 

पर्यटनावर आधारलेली अर्थव्यवस्था असेल तरीही चिनी प्रवाशांची वाढती संख्या खरे तर स्थानिक लोकांना फारशी आवडत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जरी चिनी लोक ज्येजूमध्ये येऊन पैसे खर्च करतात तरी ते पैसे नेहमी चिनी माणसाच्या हॉटेलमध्येच खर्च करतात. त्याचा स्थानिकांना काही उपयोग नाही. चिनी लोक जमिनीचे, जागेचे मालक असण्याचे प्रमाण गेल्या काही दशकात अनेक पटींनी वाढले आहे. 

पण मग नंतर आली चीन सरकारने साऊथ कोरियाला जाणारी तिकिटे विकू नयेत अशी चिनी पर्यटन कंपन्यांना केलेली सूचना. ह्याचे कारण होते दक्षिण कोरियाने उभारलेली Thadd- terminal high altitude area defense system. चीन सरकारला हे आवडले नव्हते. खरेतर चिनी लोक इतक्या जास्त प्रमाणात यायचे की ते यायचे बंद झाल्यावर पर्यटन व्यवसाय धोक्यातच आला असता. पण आता चिनी लोक येत नाहीत म्हटल्यावर, सगळीकडे त्यांचा गोंधळ नसेल असे जाणवल्यावर, दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रदेशातील लोक जास्त प्रमाणात यायला लागले. ज्येजू ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. 

 


दिवसाची सुरुवात
थोडा ढगाळ दिवस!

तर आता परत वळू या आपल्या कॅनोलाच्या फुलांकडे! कॅनोला काय आहे? रॅपसीड नावाच्या तेलबियांपासून एक सुधारित वाण तयार केला गेला. हा वाण शोधला आणि तयार केला होता कॅनडा ने. त्यामुळे कॅन म्हणजे कॅनडा आणि ओला म्हणजे तेल. रॅपसीड पेक्षा कॅनोला अधिक चांगले कारण त्यात आम्ल कमी प्रमाणात असते. ह्या तेलात अँटीबॅक्टरीअल आणि इतरही औषधी गुणधर्म आहेत. मोहरीच्या जातीतील ह्या बिया आहेत. कॅनोला ला कोरियन भाषेत यूचे म्हणतात. पण त्याचे नाव घेताना म्हणतात यूक्कोत! म्हणजे यूचे चे फुल असे म्हणतात.

वसंत ऋतूचे आगमन ज्येजू बेटावर साधारणपणे मार्चच्या मध्यात होते. ज्येजूची खासियत अशी की तुम्ही चेरी ब्लॉसम (कोरियन भाषेत त्याला बेक्कोत म्हणतात.) आणि यूक्कोत चा बहर एका वेळी पाहू शकता! ह्याच मुळे ज्येजू हे वसंत ऋतूचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण आहे. 
 


 नंतर काय दिसणार आहे ह्याची एक झलक
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या चेरी ब्लॉसम आणि कॅनोलाच्या पाकळ्या.
 
चेरीब्लॉसम चा सरता बहर 
 
चेरी ब्लॉसम - बेक्कोत 


कॅनोला ची फुले


युक्कोतचा गुच्छ 

 Seogwipo शहर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते सगळे!
घोडे, चेरी ब्लॉसम आणि कॅनोला ची फुले 


युक्कोत आणि बेक्कोत 

ह्या विस्तीर्ण पटावर बेक्कोतचा फिका गुलाबी आणि युक्कोत चा झगमगता पिवळा रंग अतिशय खुलून दिसतात. बेक्कोत ची झाडे उंच असतात तर यूक्कोत फुले झुडुपांवर येतात. लाल जमीन, पिवळे यूक्कोत, गुलाबी बेक्कोत, काळे बसाल्ट चे डोंगर आणि गडद निळे आकाश. रंगांचा आणि आकारांचा अतिशय मनोवेधक पट आपल्यासमोर उलगडत जातो! 

हे दोन्हीही म्हणजे चेरी ब्लॉसम आणि कॅनोला अल्पकाळासाठीच फुलतात. त्यामुळे तुम्हाला तुमची ट्रिप त्यांच्या फुलण्याच्या वेळा बघून त्याप्रमाणे ठरवायला लागते. आम्ही ज्येजूला एप्रिल २०१९ मध्ये भेट दिली होती आणि आमचे नशीब चांगले की आम्हांला बेक्कोतचा सरता बहर आणि यूक्कोतचा ऐन बहर बघता आला होता. 

ज्येजूच्या Seogwipo शहरात १९६० पासून कॅनोलाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जेव्हा ही फुले बघायला येणारे पर्यटक म्हणजे अर्थव्यवस्थेला भरती हे गणित स्थानिक ग्रामपरिषदांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात कॅनोलाची लागवड करायला सुरुवात केली. 

Gasi Ri नावाचे गाव कॅनोलाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त फुले बघायला मिळतात असे ते ठिकाण आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिथे ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सव भरवला जातो. विविध कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, फोटो काढण्यासाठी तयार केलेली ठिकाणे, खाद्यपदार्थ स्पर्धा, कार्यशाळा आणि विक्री, गोंडस बालक स्पर्धा, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे आणि कितीतरी कार्यक्रम असतात. तीन दिवसांसाठी हा महोत्सव चालतो. ह्या फुलांच्या बहराच्या काळात साधारणपणे १६०,००० लोक ज्येजूला भेट देतात.

 ह्या गावात १० किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे, त्याचे नाव Noksan-ro. हा रस्ता दक्षिण कोरियातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. का बरे? कारण त्याच्या दोन्ही बाजूला चेरी ब्लॉसम आणि कॅनोला फुले फुललेली असतात! दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा हे पुष्पवैभव आपल्या डोळ्यांना, मनाला सुखावत असते. जेव्हा तो रस्ता समोर येतो तेव्हा त्यांच्या प्रथम दर्शनानेच आपण अवाक होऊन जातो. नक्कीच तो जगातील सर्वात नयनरम्य रस्त्यांपैकी एक आहे.

 
Noksan Ri 



 Noksan -ro वरून प्रवास करताना अर्थातच तुम्ही अनेकदा गाडी थांबवून खाली उतरता. फोटो घेण्यासाठी! तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. त्या सुंदर दृश्याने तुमचे भान हरपलेले असते. पण विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांकडे मात्र लक्ष राहू द्या!

 Noksan Ri - एक सुंदर रस्ता!

हा प्रवास झाल्यावर किंवा खरे तर ह्या सुंदर प्रवासातच तुम्ही पोचता Gas ri पवन ऊर्जा निर्मिती केंद्राच्या जवळच्या शेतांमध्ये. आमची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळली तेव्हा समोर एक अतिशय रुक्ष भिंत आली. एखाद्या गोदामाची असावी तितकीच अनाकर्षक. मला कळलेच नाही की इतक्या सुंदर रस्त्यावरून इतक्या रुक्ष ठिकाणी ड्रॉयव्हर आम्हाला का घेऊन आला असेल? त्याने नुसते सांगितले की आत जा. त्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही आत गेलो आणि आमच्या समोर होते आयुष्यात क्वचितच पाहायला मिळते इतके सुंदर दृश्य! 

जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत ही छोटुकली, नाजूक, झळाळत्या पिवळ्या रंगाची सुंदर फुले वाऱ्यावर डोलत होती. मी आयुष्यात कधीही हे दृश्य विसरणार नाही. जादुई दृश्य, दैवी दृश्य. शांतता देणारे दृश्य. जरी मुख्य रस्ता जवळच होता, तरी वाहनांचा आवाज शांती भंग करण्यासाठी कानांपर्यंत येत नव्हता. त्या पवन चक्क्या आणि डोंगर आजोबा ह्या शेतात खेळणाऱ्या कॅनोला बाळांवर लक्ष ठेवून होते. आकाश साक्षीभावाने माझ्या उचंबळून आलेल्या भावनांकडे पाहत होते. एकदम पारलौकिक, अद्भुत अनुभव होता तो. 


















फुलांच्या महासागरात हरवताना
चकित करणारा परमानंद अनुभवताना 
हरवून जाते भान स्थळकाळाचे 
वाटते अनंतकाळापासून आहोत असेच, इथेच.
निसर्गाबरोबर एकात्मभावाचा प्रत्यय येतानाच 
ते गारुड कब्जा घेते तुमचा, 
आता तुम्हाला आनंद नुसता वाटत नसतो..
तर तुम्हीच आनंदस्वरुप बनलेले असता!! 

तिथे कुंपणे नाहीत. तुम्ही फुलांच्या जवळ जाऊ शकता, फुलांच्या रांगांतून चालू शकता. फुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच टाकलेली असते. तिथे कोणी रखवालदार नसतात. पण प्रत्येकाला हे माहिती असते, की तुमच्याकडे कोणी बघत नसताना देखील, तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमची संस्कृती आणि संस्कार दिसतात! अर्थात काही नग तिथेही असतातच, की जे फुले तोडतात किंवा फोटो काढण्याच्या गडबडीत, खरे तर नशेत, फुले पायदळी तुडवतात. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बाकी सगळे अगदी जपूनच चालतात. 

आम्ही ज्येजू ला एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो. मला उत्सुकता होती २०२० च्या ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सवाचे काय होणार ह्याची. दक्षिण कोरियाने कोरोनाचा अतिशय यशस्वी सामना केला होता. मार्च मध्येच त्यांच्याकडची रुग्णसंख्या खूप कमी झाली होती. 

मी बातम्यांवर लक्ष ठेवले होते. पण जे वाचायला मिळाले ते अतिशय धक्कादायक होते. फुले तर निसर्गनियमानुसार वेळच्या वेळीच फुलली होती. स्थानिक प्रशासन, लोकांना ज्येजूला भेट न देण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करीत होते. हॉटेल्स आणि विमानकंपन्या मात्र ज्येजूला लोकांनी भेट द्यावी म्हणून, खास सवलती जाहीर करत होत्या. बाकी अनेक देशांनी विमान वाहतूक बंद केल्याने जे कोरियन लोक दुसरीकडे फिरायला जाऊ शकत नव्हते त्या सगळ्यांनी ह्या सवलतींचा लाभ घ्यायला सुरुवात केली. 

अशा बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांमुळे, स्थानिक लोकांना कोरोना संसर्ग होण्याच्या घटना आढळू लागल्या तशी स्थानिक जनतेला आणि प्रशासनाला चिंता वाटू लागली. Seogwipo नगर परिषदेला नाईलाजाने एक दुःखद आणि क्रूर निर्णय घ्यावा लागला. 

त्यांनी चक्क चार ट्रॅक्टर आणले आणि सगळ्या शेतातून फिरवून सर्व फुले तोडून टाकली. हेक्टर च्या हेक्टर जिथे फुललेले रान होते ते आता उजाड माळरान होऊन गेले. त्या गावात अनेक वयोवृद्ध लोक राहत असल्याने, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असे नगर परिषदेने जाहीर केले. 

तुम्ही इंटरनेट वर शोधलेत तर अजूनही ह्या बातम्या आणि फोटोज पाहू शकता. 
https://www.dailymotion.com/video/x7t6qhk ह्या लिंकवर विडिओ देखील पाहू शकता.
 
मी जेव्हा बातम्या वाचल्या, हा विडिओ पाहिला तेव्हा अतिशय दुःख झाले. माणसे त्यांची पैश्यांची हाव, त्यांच्या ईच्छा आणि लहरी ह्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ह्याची शिक्षा फुलांना का? त्यांचा काय दोष? माणसांना वळण लावणे अवघड आहे, फुलांना जमीनदोस्त करणे सोपे आहे.
 
जास्त प्रमाणात पर्यटक यावेत, पैसे मिळावेत म्हणून मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली गेली. येणाऱ्या लोकांपासून, प्राणांचे भय निर्माण झाले तेव्हा त्यांना येण्यापासून रोखण्यासाठी ती उपटून टाकली गेली. एक वर्तुळ पूर्ण झाले. 

#PlacesToSeeInSouthKorea #CanolaFestivalInJeju #HaenyeoInJeju #HaenyeoWomenBraveWomen #CherryBlossomInJeju #YellowFlowersInJeju


 

 

 


शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

बृहदेश्वर मंदिर - चोला वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना

 आज आपण बृहदेश्वर ला जाणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, असे शिवलिंग ज्या मंदिरात आहे, ते हे मंदिर! ज्याचे शिखर (विमान) जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे, असे हे मंदिर!

गोपुर आणि विमान ह्या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. गोपुर हे प्रवेशद्वारावर असते तर विमान /शिखर हे गर्भगृहावर असते. अनेक वर्षे बृहदेश्वरचे शिखरच जगातील सर्वात उंच शिखर होते. पण नव्यानेच बांधलेले वाराणसीमधील मंदिर आणि अजून जे बांधून होते आहे असे वृन्दावनमधील कृष्णाचे मंदिर ही दोन मंदिरे आता जगातील सर्वात उंच शिखर/विमान असणारी मंदिरे आहेत.

 



कुठे आहे हे बृहदेश्वर? तामिळनाडूमधील तंजावर मध्ये हे मंदिर आहे. हो.. बरोबर! तेच हे तंजावर, जे कावेरी नदीच्या तीरावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे सतराव्या शतकात राज्य करत होते आणि नंतर त्यांचे वंशज जिथे राज्य करीत होते. तेच हे तंजावर, जिथे विविध विषयांवरील हजारोंच्या संख्येने दुर्मिळ पुस्तके असलेले विश्व विख्यात सरस्वती महाल वाचनालय आहे. हे तेच तंजावर, जे तंजावर शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तेच हे तंजावर जिथे भरतनाट्यम नृत्याला, कर्नाटक संगीताला सुविहित रूप देणारी चार भावंडे, सुप्रसिद्ध तंजावर चौकडी जन्माला 
आली. 

पण ह्या सगळ्यासाठी प्रसिद्ध होण्याच्याही कितीतरी आधीपासून तंजावर प्रसिद्ध होते ते बृहदेश्वर मंदिरासाठी. हे मंदिर बांधले गेले १०१० मध्ये, म्हणजे बरोब्बर १०१० वर्षांपूर्वी!! महान राजा राजराजा चोला प्रथम ह्याने हे मंदिर बांधले आणि म्हणूनच ह्याचे नाव राजराजेश्वर मंदिर असे देखील आहे. 

जेव्हा हा राजा सत्तेवर आला तेव्हा चोलांचे राज्य अगदी छोटे होते. पण नंतर राजराजा प्रथम ह्याने अतिशय कार्यक्षम सैन्य आणि शक्तिशाली नौदल उभारले. त्यांच्या जोरावर आपले छोटेसे राज्य, एक मोठे साम्राज्य बनवले. त्याने श्रीलंकेवर स्वारी करून लंका जिन्कली होती तसेच त्याच्याच कार्यकाळात त्याच्या मुलाने, राजेंद्र प्रथम ह्याने पार श्रीविजय राज्यापर्यंत म्हणजे आजचे इंडोनेशिया आणि जवळपास सगळेच दक्षिण पूर्व आशिया इथपर्यंत मोहीम नेऊन तेथपर्यंत आपले राज्य वाढवले होते. आपण ह्या मोहिमांचे संदर्भ आधीच्या काही लेखांत वाचले होतेच. 

चोलांच्या नंतर ह्या प्रदेशावर राज्य केले ते पांड्या, नंतर नायक आणि त्या नंतर मराठ्यांनी. ह्या सर्वानी बृहदेश्वर मंदिराच्या आवारात आणखी काही मंदिरे उभारली. पण सुदैवाने ही नंतर उभारलेली मंदिरे देखील मूळ आराखड्याच्या सौंदर्यात भर घालतील, अशाच रीतीने उभारली गेली. 

ब्रिटिशांनी जेव्हा हा भाग काबीज केला होता तेव्हा म्हणजे साधारण १७७२- १८०१ मध्ये हे मंदिर, ब्रिटिश सैनिकांच्या बराकी म्हणून वापरले गेले आणि मंदिराचे बरेच नुकसान झाले. महाराज सर्फोजी राजे भोसले ह्यांनी १८०१ मध्ये पुढाकार घेतला आणि मंदिराची दुरुस्ती, संगोपन ह्यात लक्ष घातले. आज देखील भोसल्यांचेच वंशज मंदिराची व्यवस्था बघतात. 

इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा मी जूनमध्ये अधिकृतरीत्या माझा प्रवास वर्णनाचा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा मला सारखे वाटत होते की आपल्याला ह्या सगळ्या मूर्तींच्या मागचा अर्थ माहिती असायला हवा. मूर्तिशास्त्राची, इंडॉलॉजीची माहिती हवी. तसे तर आपल्याला सगळ्यांनाच आपण प्राचीन मंदिरे, लेण्या पाहत असतो तेव्हा असेच वाटत असते. पण पावलो कोएलो ने अल्केमिस्ट मध्ये लिहिले आहे ," जेव्हा तुम्ही कशाची तरी मनापासून इच्छा करता तेव्हा हे संपूर्ण विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी काम करायला लागते!" माझ्या बाबतीत तसेच झाले. VivekSaptahikमध्ये आलेली एका ऑनलाईन कोर्स विषयीची जाहिरात मला दिसली

ह्या वर्गात Virasat च्या इंद्रनील बंकापूरे ह्यांनी अत्यंत बारकाईने आणि सहनशीलतेने आम्हाला हिंदू मंदिरातील शिल्पकलेविषयी समजावून सांगितले. ह्यामुळे भारतीय तत्वज्ञान, वास्तुकला, कला आणि संस्कृती ह्याविषयी जास्तच उत्सुकता निर्माण झाली. 

 नंतर माहिती मिळाली ह्याच क्षेत्रात काम करणाऱ्या Haaक ह्या संस्थेविषयी आणि अगदी जेव्हा मी बृहदेश्वर मंदिराची पोस्ट लिहिण्यासाठी अभ्यास करत होते तेव्हाच haaक च्या क्षेत्रभेटीत (अर्थात ऑनलाईन क्षेत्रभेट!), उत्साही आणि ज्ञानी वक्त्या केतकी पटवर्धन ह्यांच्याबरोबर बृहदेश्वर ला भेट देता आली. खरेच संपूर्ण विश्व माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते आहे की नाही!! 

इतक्या मोठ्या प्रस्तावनेनंतर, चला तर जाऊ या आता बृहदेश्वर ला! जेव्हा तुम्ही ह्या मंदिराच्या जवळ येता तेव्हा प्रथमदर्शनीच भारावून जाण्याची अनुभूती मिळते. प्रचंड मोठे शिखर दुरूनही दिसते. मंदिराची भौमितिक रचना आहे आणि ती अगदी गणिती अचूकतेने उभारण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराशी उभे राहता, तेव्हा बाहेरचे गोपुर, आतले गोपुर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिर सगळे अगदी एका सरळ रेषेत आहेत. ह्या फोटोत तुम्हाला हे दिसेलच. 



Outside the main entrance- Gopuram

Beautiful images on the Gopuram


The Geometrical accuracy

आहे ना हा वास्तुकलेचा विलक्षण सुंदर नमुना?! प्रवेशद्वारावर, गोपुरावर शेकडो प्रमाणबद्ध सुंदर मूर्ती आपल्याला दिसतात आणि पुढे आपल्याला चोला वास्तुशैलीचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळणार आहे ह्याची चुणूक दिसते. 
 
Well.. you can't stop taking photos!!

बृहदेश्वर ह्या नावात जाणवते ते सगळे गुण ह्या मंदिरात आहेत. ते उंच आहे, रुंद आहे, भव्य आहे, दणकट आहे, शक्तिवान आहे, सुंदर आहे... सगळे काही आहे. हा परिसरच भव्य आहे. नायक राजांनी ह्या मंदिराभोवती एक छोटा किल्ला, त्याच्या भोवती खंदक आणि एक तळेदेखील आहे असा किल्ला बांधला आहे. त्याचे नाव शिवगंगा. 

मंदिराचे प्राकार अतिशय भव्य आहे. त्यात अनेक मंदिरे आहेत. गणपती, कार्तिकेय म्हणजेच सुब्रमण्यम, पार्वती माता ही त्यातली काही मंदिरे. मी तुम्हाला ह्या प्राकाराच्या स्वरूपाविषयी कसे बरे सांगू? थांबा, मी १७ ऑगस्ट २०१८ ला काढलेला एक छोटासा व्हिडिओच बघा. म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल. 




सुब्रमण्यम मंदिरात अतिशय शोभिवंत असे खांब असलेली रचना आहे. हे खांब अर्धे भिंतीत आहेत, आणि अर्धी बाहेर असलेली बाजू कोरीवकाम केलेली आहे. 

Subramaniam Temple 
📷Girish Tilak 

गणपती मंदिर तसे त्या मानाने साधे आहे पण त्याचे शिखर मात्र कोरीव कामाने सजवलेले आहे. नऊ मजली इमारत असावी तेवढे उंच हे शिखर आहे. 
 
Ganesh in Brihadeshwar
📷Girish Tilak 

प्राकाराच्या बाहेरच्या भागाच्या केंद्रस्थानी आहे नंदी मंडप. हा महाकाय नंदी एकाच पाषाणातून अखंड कोरलेला आहे. किती असेल ह्याचा आकार? तर हा सोळा फूट लांब आणि तेरा फूट उंच आहे. 

Nandi
📷Girish Tilak 

त्याच्या छतावरची चित्रे ही नंतरच्या म्हणजे बहुधा नायक राजांच्या काळातील असावीत असे म्हणतात. 

Nandi Mandap From other side


आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊ या. प्राकाराच्या मागच्या भागाच्या अर्थातच केंद्रस्थानी आहे हे मुख्य मंदिर. 

शिवलिंगाची उंची आहे २. ७ मीटर! इतक्या उंच पिंडीच्या अभिषेकासाठी चक्क एक गॅलरीच बांधलेली आहे. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही. 

मंदिर सांधारा पद्धतीचे आहे. म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे तो खांबा खांबांच्या गॅलरी ने बंदिस्त केलेला आहे. खालच्या भागात काही चित्रे रंगवलेली आहेत. वरच्या भागात १०८ नृत्यमुद्रा दाखवणाऱ्या मूर्ती आहेत. आपण आधी पाहिलेच होते की भरतनाट्यम नृत्याला आत्ताचे सुविहित रूप देण्यात बृहदेश्वरचा आणि तंजावरचा मोठा वाटा आहे. 



Mural of RajRaja I with his Guru
📷 Wikipedia


ते भव्य शिखर ज्याच्यामुळे मंदिराला बृहदेश्वर किंवा मोठे मंदिर हे नाव मिळाले ते शिखर आहे २१६ फूट उंचीचे! म्हणजे साधारण २१ मजली इमारती इतक्या उंचीचे! शिलालेखांतून त्याचा उल्लेख दक्षिण मेरू म्हणून केलेला आढळतो. 
 



बृहदेश्वर मंदिराच्या समोर
📷Girish Tilak


शिखराचा दोन मजली प्रस्तर आहे. त्यावर विविध मूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यात प्रामुख्याने शिवाच्या मूर्ती दिसतात. शिखराच्या मध्ये आपल्याला काही खिडक्या देखील दिसतात. प्रस्तराच्या वर तेरा ताल आहेत. ताल म्हणजे शिखरावर असलेले मजले किंवा थर. वर जाताना हे क्षेत्रफळाने कमी कमी होत जातात आणि म्हणूनच शिखराला निमुळता आकार येतो.

तालांच्या वर अष्टकोनी पायावर बसवलेला गोल घुमट, कळस आहे. हा भाग आतून पोकळ आहे. नंदी प्रमाणेच हा देखील एका पाषाणातून कोरलेला असा अखंड, अवाढव्य कळस आहे. वजन आहे अवघे ८० टन. त्यावर एक तांब्याचा कलश आणि त्यावर सोन्याचा शिरोबिंदू स्थापिलेला आहे. 

मंदिराच्या भिंतींवर वेगवेगळ्या शतकात कोरले गेलेले विविध शिलालेख आहेत. 

 
Inscriptions

Inscriptions

राजाने आणि राजपरिवाराने मंदिराला दिलेल्या विविध देणग्या, भेटी, जडजवाहीर ह्यांची यादीच ह्या शिलालेखात दिलेली दिसते. ह्याखेरीज मंदिर कोणी, कसे, कधी उभारले? त्या सर्व कारागिरांची नावे, कोणत्या पूजा कधी, कशा व्हाव्यात? कोणी कराव्यात? त्याचा विधी काय? अगदी हे सगळे देखील शिला लेखात सविस्तर लिहिलेले आढळते. इतक्या सविस्तर नोंदी ठेवणारे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. शिलालेखांचे १०७ परिच्छेद आहेत. 

शिखरातून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देणारे पन्हाळ देखील अगदी बघण्याजोगे आहेत. 


Interesting feature


Brihadeshwara -- till we meet again


बृहदेश्वर हे भारतातील सर्वात जास्त पर्यटक भेट देतात अशा स्थानांपैकी एक आहे. शिवभक्त, वास्तुशास्त्र आणि इंडॉलॉजी चे अभ्यासक, पर्यटक, आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि विद्वान लोक बृहदेश्वरला अनेकदा भेट देत असतात. छायाचित्रकारांसाठी तर तो स्वर्गच आहे. तुम्ही सकाळी लवकर भेट देऊन ह्या वातावरणाचा आनंद अनुभवू शकता. आम्ही तर सकाळी सहा वाजताच मंदिरात पोचलो होतो. त्यामुळे आकाशातल्या अनोख्या रंगछटा आणि उंचच उंच कळस ह्यांचे अद्भुत दर्शन झाले.


Simply magnificent!


बृहदेश्वरचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळांमध्ये द ग्रेट लिविंग चोला टेम्पल्स म्हणून झाला आहे. ह्या मध्ये बृहदेश्वर सोबतच गंगाईकोंडा चोलापूरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर ह्यांचा समावेश आहे. लिविंग टेम्पल चा अर्थ आहे की जिथे पूर्वीपासून आजपर्यंत, अजूनही पूजा अर्चा होते आहे असे मंदिर. 

चोलांच्या शिवभक्तीचा बृहदेश्वर हा एक अप्रतिम पुरावा आहे. ते एक शैव संप्रदायाचे, चोला काळातील वास्तू शास्त्र, शिल्पकला, गणित, धातुशास्त्र आणि चित्रकलेतील प्राविण्याचे, प्रगतीचे अनुपम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर पाहून, तुमचे मन पुन्हा एकदा महान भारतीय वारसा, भारतीय कला आणि संस्कृती ह्या विषयीच्या अभिमानाने भारावून जाते.

राजा राजराजेश्वर स्वतःला शिवपाद शेखर म्हणवून घेत असे. शिवपाद शेखर चा अर्थ आहे, ज्याचा मुकुट शिवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, जो शंकरा समोर नतमस्तक आहे. त्याने बहुधा शिवाचे, देवांच्या सर्वश्रेष्ठ शक्तीचे, सर्वत्र असणारे, सार्वकालिक महान अस्तित्व जगाला दाखवून देण्यासाठी, जाणवत राहावे म्हणूनच इतक्या भव्य राजराजेश्वर अर्थातच बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली. 

#TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple
#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

कुंभलगड - एक आश्चर्य - भारतातील सर्वात जास्त लांबीची भिंत. 

 मागच्या आठवड्यात मी माझ्या टेराकोटा सेना ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये चीनच्या प्रसिद्ध भिंतीचा उल्लेख केला होता. म्हणून ह्या वेळी ठरवले होते की तुम्हाला ती चीन ची भिंत दाखवायला घेऊन जावे. पण मग वाटले तुम्हाला भारतातली प्रसिद्ध भिंतच दाखवावी, कदाचित ही भारतातली भिंत पण बऱ्याच जणांना माहितीच नसेल! 

संपूर्ण जगातील क्रमांक दोनची लांब भिंत म्हणून ही भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून पण घोषित केलेलं आहे. हे ठिकाण आहे तळ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या, राजस्थानमधील उदयपूर ह्या शहरापासून साधारण ९० किलोमीटर वर. ही भिंत बांधली गेली आहे कुंभलगड किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणून. 




कुंभलगड 
📷 गिरीश टिळक 


अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर कुंभलगड किल्ला आहे. राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड वन्य जीव अभयारण्यात हा किल्ला वसलेला आहे. त्याची अतिशय दुर्गम जागा आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्यामुळे कुंभलगड हा अजेय आणि अभेद्य किल्ला बनला आहे. मेवाड भागातील सर्वात भक्कम किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक लागेल. 

हा किल्ला पंधराव्या शतकात राणा कुंभ ह्यांनी बांधला. फक्त हा किल्लाच नव्हे तर मेवाडचा इतिहास देखील राणा कुंभाचे नाव एक शूर योद्धा म्हणून लक्षात ठेवतो. राजस्थानमधील अनेक छोटी छोटी राज्ये त्यांनी एकत्र केली. आक्रमकांविरुद्ध, मुस्लिम सुल्तानांविरूद्ध राणा कुंभांनी जोरदार लढा दिला. त्यांचे राज्य रणथंबोर पासून ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर पर्यंत पसरले होते. 


महाराणा कुंभ 
📷Commons Wikimedia.org

राणा कुंभांनी एकूण ३२ किल्ले बांधले किंवा त्यातील बऱ्याचशा किल्ल्यांचे पुनरुज्जीवन केले. चित्तोडगड वरील कीर्तिस्तंभ देखील त्यांनीच बांधलेला आहे. हा सात मजली सुंदर विजयस्तंभ मोहम्मद खिलजीवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून बांधण्यात आला आहे. 


 महाराणा कुंभ ह्यांनी बांधलेला कीर्तिस्तंभ, चितोडगड. 
📷Commons Wikimedia.org

महाराणा कुंभ अतिशय चांगले वीणावादक होते तसेच त्यांना संगीतात देखील चांगली गती होती. वेद आणि उपनिषदांचे त्यांनी अध्ययन केलेले होते. 
असे म्हणतात की ह्या ठिकाणी साधारण दुसऱ्या शतकात एका जैन राजपुत्राने छोटा किल्ला वसवला. पण मध्ये अनेक शतके हा किल्ला विस्मृतीत गेला होता, दाट जंगलात,विजनवासात होता. महाराणा कुंभ ह्यांनी ह्या जागेचे आणि पर्यायाने दुर्गम किल्ल्याचे महत्व ओळखले आणि तो साधारणपणे सध्या आहे त्या स्वरूपात बांधून घेतला. त्या काळाचे विख्यात वास्तुरचनाकार मदन ह्यांनी हा किल्ला बांधण्यात सहाय्य केले आहे. १४४३-१४५८ इतकी वर्षे बांधकाम चालू होते. 

तो राजस्थानमधील सर्वात उंच किल्ला आहे. तुम्ही उदयपूर किंवा जोधपूरहून कुंभलगडला जाऊ शकता. तुमच्या राजस्थान सहलीत ही दोन्ही ठिकाणे तर असणारच. 

पर्यटकांची वाहने किल्ल्यात आणायला परवानगी नाही. त्यामुळे ती बाहेर उभी करून आत चालत जायला लागते. किल्ल्याच्या भव्य विस्तारात अनेक दरवाजे आहेत. त्यांना तिथे पोल म्हणतात. आपल्याला हनुमान पोल, राम पोल असे अनेक दरवाजे बघायला मिळतात. माझ्या आठवणीने ह्या वाहन तळाजवळच्या फोटोतल्या दरवाजाचे नाव राम पोल होते. 
 

वाहनतळावरून दिसणारे किल्ल्याचे दृश्य 
📷 गिरीश टिळक 


हनुमान पोल 


किल्ल्याच्या आत निवासी भाग देखील आहे. तिथे लोक राहतात. त्यामुळे आपल्याला नव्या पद्धतीची अनेक घरे, झोपड्या, अपार्टमेंट्स असे सगळे तिथे दिसते. पण तरीही त्या भव्य परिसरात विखुरलेल्या जुन्या इमारती नक्की लक्ष वेधून घेतातच. 


किल्ल्याच्या आतला भाग 

विविध टेकड्यांवर मिळून हा किल्ला बांधला आहे. त्या टेकड्यांच्या चढ उतारांवर बांधलेला किल्ला असल्याने कित्येक ठिकाणी रस्त्याला अगदी खडी चढण आहे. ह्या फोटोत देखील रस्त्याला असलेला चढ तुम्ही बघू शकता! किल्ल्यात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. त्यांची संख्या तीनशेहून अधिक आहे असे म्हणतात. 


किल्ल्यातील मंदिर 
📷 गिरीश टिळक 


किल्ल्यातील अनेक मंदिरांपैकी एक मंदिर

 
किल्ला 

खालून दिसणारे कुंभ महालाचे दृश्य 

किल्ल्याची सुंदर भिंत 

किल्ल्याची सुंदर भिंत.

जरा चढून वर आलात की तुम्हाला किल्ल्याचा भव्य परिसर आणि ती सुप्रसिद्ध लांब भिंत दिसू लागते. कुंभलगड जगातील दोन नंबरच्या लांब भिंतीसाठी प्रसिद्ध आहे. ही भिंत जवळपास ३२ ते ३४ किलोमीटर लांबीची आहे. भिंतीचा काही भाग अभयारण्यातून जातो. तुम्ही त्या भिंतीवरून चालत चालत एक संपूर्ण फेरी मारू शकता. पण सोबत मार्गदर्शक मात्र घेऊन जा. कारण अभयारण्यात वन्य प्राणी देखील आहेत. ज्या ठिकाणाहून निघाला असाल तिथे फेरी पूर्ण करून परत यायला किमान दोन दिवस तरी लागतील.


वरून दिसणारे किल्ल्याचा परिसर आणि भिंत. 


किल्ला,भिंत आणि अरावली पर्वत रांगा.

कुंभलगड ची सुप्रसिद्ध भिंत 
📷 गिरीश टिळक 


भिंत काही ठिकाणी इतकी रुंद आहे की एकावेळी शेजारी शेजारी असे आठ घोडे धावू शकतील. विशेष गोष्ट अशी की भिंत सरळ रेषेत बांधलेली नाही तर वेगवेगळ्या टेकड्यांची जशी नैसर्गिक वळणे असतील त्या नुसार बांधलेली आहे.

किल्ल्यावर देखील काही एकदम अवघड वळणे आहेत. त्यामुळे शत्रूने चढाई केली तरी शत्रूला आत येणे अवघड होत असणार. हा किल्ला म्हणूनच कोणी जिंकू शकले नाही. एकदाच मुघलांनी कब्जा केला होता पण तो देखील नेहमीच्या मुगल पद्धतीप्रमाणे कपटाचा आधार घेऊन, पाण्यात विष कालवून. अश्या मार्गाने जिंकून घेतलेला किल्ला ते फार काळ स्वतःकडे राखू शकले नाहीत. राजपूत राजांनी तो परत जिंकून आपल्या ताब्यात घेतला. ह्या किल्ल्याला अनेक युद्धांचा, कटांचा, सत्तेच्या हव्यासाचा इतिहास आहे. 

भिंतीवर अनेक ठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. भिंतीला छोट्या छोट्या कोनाड्यांप्रमाणे खिडक्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे तिरंदाज त्यातून नेम धरून शत्रूवर बाण तर मारू शकतील पण त्यांना स्वतःला भक्कम दगडी भिंतीचे संरक्षण असेल. 


टेहळणी बुरुज 


किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. त्यामुळे नक्कीच मार्गदर्शकाची आवश्यकता भासते. अन्यथा काय बघायचे, कुठल्या मार्गाने जायचे हे कळणारच नाही. वाहन तळा जवळ तिकीट खिडकी आहे तिथे मार्ग दर्शक मिळू शकतात. 

किल्ल्याच्या आतल्या इमारती म्हणजे नुसत्या भिंती, रिकाम्या खोल्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा तरी तिथे चित्रे, काही कलाकृती असे काही नव्हते. ते सगळे म्हणे गेले आहे, निरनिराळ्या वस्तू संग्रहालयात आणि काही हॉटेल्स मध्ये. 

पगडा पोल जवळ एक खास वास्तू आहे जिचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ते आहे महाराणा प्रतापचे जन्मस्थळ! आयुष्यभर लढत राहून, मुगल राजा अकबराला विरोध करत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवणारा महाराणा प्रताप! 
 


महाराणा प्रताप जन्मस्थळ 


ही इमारत महाराणा प्रताप जन्मस्थळ म्हणून दाखवली जाते. कुंभलगड ह्या नावाशी आणखी एक आख्यायिका जोडली गेलेली आहे. राणी कर्णावतीची मदतनीस आणि राजा उदयसिंग (दुसरा) ह्याची दूध आई असलेली पन्नादाई आपण सर्वाना माहिती आहेच. तिने स्वत:चा मुलगा चंदन ह्याचा बळी देऊन बाल राजा उदयसिंग (दुसरा) ह्याचे प्राण वाचवले. मग उदयसिंग (दुसरा) ह्याला गुप्तपणे कुंभलगड ला आणण्यात आले. दुसऱ्याच नावाने इथेच वाढविण्यात आले आणि इथेच त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच सुमारास त्याला ह्याच किल्ल्यावर पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्र म्हणजेच प्रतापसिंग जो पुढे महाराणा प्रताप म्हणून विख्यात झाला. पन्नादाईचे नाव असलेली एक जागा देखील किल्ल्यात दाखवली जाते.

बादल महाल 

किल्ल्यात सर्वात उंच ठिकाणी असलेली बादल महाल ही इमारत त्या मानाने नवी म्हटली पाहिजे. राजा फतेसिंगानी एकोणिसाव्या शतकात बांधली आहे ही इमारत. त्या महालाचे दोन स्वतंत्र भाग आहेत, जे जिन्यांनी आणि एका रस्त्याने एकमेकांना जोडले गेले आहेत. ते दोन भाग जनाना आणि मर्दाना निवासासाठी होते असे सांगितले जाते. 

जोडणारा रस्ता 



बादल महालातून दिसणारे दृश्य 



बादल महालाची हवेशीर खिडकी
📷 गिरीश टिळक 

पावसाळ्यात हा महाल संपूर्णपणे ढगांनी आच्छादलेला असतो, म्हणून त्याचे नाव बादल महाल. किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणावरून दिसणारे दृश्य इतके सुंदर आहे की इतके जिने आणि चढाचे रस्ते पार करून इथे पोचल्याचे सार्थक होते. अरवलीच्या पर्वतरांगा तर दिसतातच पण हवा स्वच्छ असेल तर पार अगदी दूरवरचे वाळवंट देखील इथून दिसते म्हणतात. 

सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावर एक सुंदर, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने इतिहास जिवंत करणारा कार्यक्रम असतो. तो नक्की पहा. नंतर तासभर किल्ल्यावर रोषणाई केलेली असते. छायाचित्र कारांसाठी तर ही पर्वणीच असेल. आम्ही मात्र हा कार्यक्रम बघू शकलो नाही. आम्हांला दुपारी निघून रात्रीपर्यंत पुष्करला पोचायचे होते. 

किल्ल्यात जरी काही चित्रे, कलाकृती नसल्या तरीही कुंभलगड हे अगदी नक्की भेट द्यावी असेच ठिकाण आहे. ती सुप्रसिद्ध भिंत, सुंदर वास्तू, महाराणा प्रतापाचे जन्मस्थळ आणि अरवलीच्या पर्वत रांगा. तुमचे मन नक्कीच आकर्षून घेतील. 

कुंभलगड ला भेट देण्याचा सर्वात चांगला काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. त्या नंतर खूप उन होते. आधी जुलैच्या सुमाराला, पावसाळ्यात पण सगळे हिरवेगार आणि सुंदर दिसते म्हणतात. पण रस्ते मात्र निसरडे झालेले असतात. 

किल्ल्यातला चढ बराच आहे, काही ठिकाणी अवघड पण वाटेल. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी एक काठी सोबत घ्यायला हवी. पण तरीही इथे जा नक्की!! सगळ्या मंदिरांसकट गड बघायचा असेल तर मात्र संपूर्ण दिवस राखून ठेवा. नाहीतर मग तीन चार तास पुरेसे आहेत. 
तुम्ही किल्ल्याच्या अगदी जवळ येईपर्यंत तुम्हाला इथे एखादा किल्ला आहे आणि तो देखील एवढा अजस्त्र हे कळत देखील नाही हे ह्याच्या रचनेचे आणि वळण वळणांच्या रस्त्यांमुळे घडवलेले नवल आहे. म्हणूनच हा किल्ला कायम राजपूत राजांचे आश्रयस्थान, संकटांपासून वाचण्याचे ठिकाण होता. 

#TheLongestWallInIndia #SecondLongestWallInWorld #RajputKingsLegends #GreatWarriorMaharanaPratap #WondersOfArchitecture #PlacesToSeeInRajasthan #WhatShouldYouKnowBeforeTravellingToRajasthan 


भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...