रविवार, २ ऑगस्ट, २०२०

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

 आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि तुम्हाला दोन महान राम भक्तांना भेटायला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे. 


पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राची अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. 


भारतात अजूनही काही ठिकाण आहेत की जी हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे.


हंपीपासून अंजनेय टेकडी पर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो.


भात शेती

केळीच्या बागा

भातशेतीचा मखमली गालिचा

टेकडीच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाण्याजोगा रस्ता आहे. वाहन तळा जवळच काही छोटी दुकाने आहेत. हनुमान मंदिरा पर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला जवळजवळ सहाशे पायर्‍या चढायला लागतात. चढताना दिसणारे सुंदर दृश्य आणि आपल्यासोबत चढणार्‍या आणि उतरणाऱ्या यात्रे करून कडून होणारा 'जय श्रीराम' हा जय घोष यामुळे पायऱ्या चढण्याचे श्रम जास्त जाणवत नाहीत.



पायऱ्या चढताना दिसणारे सुंदर दृश्य


हनुमानाचे जन्मस्थळ असल्यामुळे जगभरातून अनेक भक्त, हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. हनुमान हा शक्ती, बुद्धी आणि भक्तीची देवता मानला जातो. टेकडीच्या माथ्यावर एक छोटेसे हनुमान मंदिर आहे, जिथे हनुमानाची मूर्ती दगडात कोरलेली आपल्याला बघायला मिळते.


हनुमान मंदिर


इथे तुम्हाला हनुमानाच्या दुसऱ्या प्रजातीच्या भक्तांच्यापासून सावध राहायला पाहिजे, ते म्हणजे माकडांपासून! तुम्हाला इथे सगळीकडेच खूप खूप खूप माकडे दिसतील.. कृपया त्यांना अन्न भरवायला किंवा काहीही चिडवायला जाऊ नका. कारण ती अतिशय आक्रमक होऊ शकतात.


मीच जिंकलो!

प्रचंड खडक, सुंदर दृश्य!

टेकडीच्या माथ्यावरून तुम्हाला 360 डिग्रीतून अतिशय विहंगम दृश्य आणि हंपीचा पूर्ण भाग दिसू शकतो.जर का तुमच्याकडे चांगली दुर्बीण किंवा कॅमेरा असेल तर तुम्हाला हंपीमधील सुंदर मंदिरे देखील इथून दिसतील. मला तुम्हाला सांगायला आवडेल की हंपी हा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला भाग आहे.


दगड, खडक, शिळा

शेतं, नदी आणि शहर

पंपा सरोवर हे अंजनेय टेकडी पासून जवळच म्हणजे साधारण पाच ते दहा किलोमीटरच्या परिसरात असेल. इथेच शबरीने मातंग ऋषींच्या आश्रमात राहून भगवान श्रीरामाची वाट पाहिली. शबरी भगवान श्री रामाची महान भक्त होती. पूर्ण आयुष्यभर तिने मातंग ऋषींचा आश्रम सांभाळला आणि श्रीरामांच्या दर्शनाची वाट पाहत राहिली. पंपासरोवर हे नाव माता पार्वती मुळे आलेले आहे. इथे पार्वती मातेने तपश्चर्या केली होती.


पंपा सरोवर


आपल्याला इथे जुन्या मंदिरांचे काही दगडी खांब अवशेष रुपात दिसतात. इथे शंकराचे आणि पार्वतीचे मंदिर आहे. झाडाखाली असलेला गणेश आहे आणि शबरी गुफा, मातंग ऋषि आश्रम आहे.


शबरी धाम, मातंग ऋषी आश्रम


पंपा सरोवर ( 📷 श्री. गजानन साठे.)

मंदिर- पंपा सरोवर ( 📷 श्री. गजानन साठे.)


असे म्हणतात की पंपासरोवर पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. आम्ही मार्च महिन्यात गेलो होतो आणि पंपा सरोवराचा आकार बघून आमची थोडी निराशाच झाली होती. कारण हंपीला आम्ही राहत होतो, तिथून येता जाता आम्हाला सुंदर कमलापूर तलाव पाहायला मिळायचा. तो खूप मोठा होता आणि त्यामुळेच पंपासरोवर त्याच्याहुन मोठे म्हणजे किती भव्य असेल, अशी कल्पना करत आम्ही तिथे गेलो.

 तिथे सरोवरात आधी ऐकले होते त्याप्रमाणे असंख्य कमळाची फुले तर सोडाच एकही कमळाचे फूल नसल्यामुळे आमची आणखीच निराशा झाली! तिथे एक खूप चांगला नकाशा बघायला मिळाला. त्यात भगवान श्रीरामांनी भारतात कुठे कुठे भेटी दिल्या, त्या जागा सांगितल्या होत्या.


भगवान श्रीरामांनी भेट दिलेली ठिकाणे


जवळच अनेगुंदी नावाचे एक छोटे गाव आहे. तिथे रंगनाथ स्वामी मंदिर आहे. त्या मंदिरात शेषशायी विष्णू मूर्ती बघायला मिळते. तेथे जवळच गगन महाल नावाचा एक जुना राजवाडा आहे. वेळेच्या अभावी आम्हाला तो बघता आला नाही. मात्र त्या दिवशी आम्ही गेलो अनेगुंदी किल्ल्यात. इथे परत जरा पायऱ्या आहेत चढायला. किल्ल्यात एक प्रसिद्ध दुर्गा मंदिर आहे. त्याच्या समोर प्रचंड मोठं झाड आहे.


अनेगुंदी किल्ला

माता दुर्गा मंदिर सुंदर शिल्पाकृती असलेले खांब

अनेगुंदी किल्ल्यात काही गुहा पण पाहायला मिळतात. असे सांगितले जाते की किष्किंधेचा राजा वाली ह्या गुहेत काही काळ राहिला होता. या गुहांच्याही पुढे तुम्ही आणखी काही अंतर चालून गेलात तर तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचे अत्यंत सुंदर दृश्य वरून पाहायला मिळते. 


ही सगळी ठिकाणे अर्ध्या दिवसात पाहून होऊ शकतात. अर्थातच हे तुमच्या पायऱ्या चढण्याच्या वेगावर देखील अवलंबून आहे. 


तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचे व विविधतेचे अन्न जवळपासच्या रेस्टॉरंटस मध्ये मिळू शकते. दिसायला जरी साधी असली तरी या रेस्टॉरंट मधले अन्न चविष्ट होते. त्यांनी आमच्या विनंतीवरून आणखी काही विगन पदार्थ देखील करुन दिले होते. 


ही ट्रिप आम्ही केली होती, मार्च 2018 मध्ये. आम्ही कमलापूरच्या KSTDC हॉटेल मध्ये राहिलो होतो. हे हॉटेल अतिशय योग्य जागी आहे. रस्त्याच्या पलिकडेच आर्किऑलॉजिकल म्युझियम आहे आणि हा संपूर्ण भाग जागतिक वारसा स्थळाच्या जवळ आहे. एयर कंडिशन्ड खोल्या, रेस्टॉरंट आणि एक दुकान असलेले हे हॉटेल चांगले आहे.


 कमलापूर, हंपीमधील

आम्ही उतरलो होतो ते हॉटेल.



आर्किऑलॉजिकल म्युझियम अतिशय सुंदर आहे आणि जर का ते अगदी नीट, बारकाईने पाहायचे म्हटले तर तुम्हाला संपूर्ण एक दिवस लागेल. आम्हाला मात्र जेमतेम एक दोन तास बघण्यासाठी मिळाले होते.

शेषशायी विष्णू, म्युझियम परिसर

म्युझियम परिसर

अनोखे शिल्प

थोडक्यात काय तर तुम्ही भगवान श्री रामाचे भक्त असा किंवा नुसते पर्यटक, गिर्यारोहक किंवा पुरातत्व अभ्यासक,अंजनेय टेकडी, पंपासरोवर, अनेगुंडी किल्ला आणि आर्किओलॉजीकल म्युझियम ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीजोगे काहीतरी सापडेलच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...